अपूर्ण काम, कोट्यवधींचे बिल आणि राजकीय दबाचा आरोप – नागरिक त्रस्त
भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या भोवऱ्यात अडकली आहे. माजी सभागृह नेते व नगरसेवक खान मतलुब अफजल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (भिवंडी शहर, अल्पसंख्याक विभाग) अध्यक्ष याकूब शेख यांनी कचरा व्यवस्थापन ठेक्यातील मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश करत मनपा प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.
तक्रारीनुसार, सुप्रिमो गोल्ड इरिगेशन लिमिटेड या कंपनीला १८ महिन्यांत एकूण ४.६२ लाख मेट्रिक टन कचरा विल्हेवाटीचा ठेका देण्यात आला होता. मात्र १४ महिने उलटूनही कंपनीने केवळ १.५० लाख मेट्रिक टन कचऱ्याचीच विल्हेवाट लावली आहे. आधुनिक यंत्रसामग्री वापरण्याऐवजी केवळ जेसीबीद्वारे वरवरची साफसफाई करून खानापूरी केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या हलगर्जीपणामुळे शहरातील विविध भागांमध्ये कचऱ्याचे प्रचंड ढिग साचले असून नागरिकांना असह्य दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. डेंगू, मलेरिया, टायफॉईडसारख्या रोगांचा धोका वाढला असून रुग्णसंख्याही वाढत आहे. तरीदेखील कंपनीने कोट्यवधी रुपयांची बिले उचलली आहेत आणि ती राजकीय दबावाखाली मंजूर करण्याचे हालचाली सुरू असल्याचे खान मतलुब व याकूब शेख यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणाची लेखी तक्रार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे. तरीसुद्धा अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढली असून प्रशासनावरील अविश्वास आणखी गडद होत आहे. नेत्यांनी इशारा दिला आहे की, जर संबंधित कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून देयके रोखली नाहीत, तर ते न्यायालयीन लढाई लढण्यास मागेपुढे पाहणार नाहीत.
भिवंडी शहरात या खुलाश्यानंतर चर्चांना उधाण आले आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अडकलेले नागरिक प्रशासनाच्या भूमिकेबाबत तीव्र प्रश्न विचारत आहेत. मनपा भ्रष्टाचाराच्या या आरोपांवर पडदा टाकणार की खरी चौकशी करून दोषींवर कारवाई होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.