भिवंडी : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचेच नाव देण्यात येईल, असे ठाम आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या या सकारात्मक आश्वासनामुळे ६ ऑक्टोबर रोजी विमानतळ परिसरात होणारे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
मुंबईत शुक्रवारी झालेल्या सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही भूमिका जाहीर केली. या बैठकीस स्थानिक सर्वपक्षीय आजी-माजी आमदार, खासदार, मंत्री तसेच भूमिपुत्र मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दि.बा. पाटील यांच्या नावाला सकारात्मक संकेत दिल्याचे सांगितले.
खा. बाळ्या मामा म्हणाले, “विमानतळ नामांतराच्या श्रेयवादात मी पडणार नाही. हे श्रेय स्थानिक भूमिपुत्रांचेच आहे. मुख्यमंत्र्यांचे आश्वासन हा आंदोलनाच्या विजयाचा पहिला टप्पा आहे. परंतु, प्रत्यक्ष विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव लागेल तोच आमचा जल्लोषाचा दिवस असेल.”
त्याचबरोबर त्यांनी सरकारला इशारा देत सांगितले की, जर दिलेले आश्वासन पाळले नाही तर आणखी उग्र आंदोलन करण्यात येईल.
या पत्रकार परिषदेत सीए निलेश पाटील, सुशांत पाटील, डॉ. तपन पाटील, प्रा. सागर पाटील, डॉ. गिरीश साळगावकर, सर्वेश तरे, अविनाश सुतार, पुंडलिक वाडेकर, हिरा पाटील आदींसह मोठ्या संख्येने भूमिपुत्र उपस्थित होते.