वृत्त
*ठाणे जिल्ह्यात खरीप हंगामात गुणवत्तेच्या निगराणीसाठी भरारी पथकांची स्थापना*
दि. २३ मे २०२५ (जिल्हा परिषद,ठाणे)– खरीप हंगामाला सुरुवात झाल्याने जिल्ह्यात रासायनिक खते आणि बी-बियाण्यांचा पुरवठा सुरू झाला आहे. याबाबत गुणवत्तेची सुनिश्चिती करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ठाणे जिल्ह्यात एक जिल्हास्तरीय आणि पाच तालुकास्तरीय अशा एकूण सहा भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
या भरारी पथकांच्या माध्यमातून कृषी निविष्ठांमध्ये गुणवत्तेची काटेकोर तपासणी, तक्रारींचे त्वरित निवारण आणि बेकायदेशीर विक्रीवर नियंत्रण ठेवण्याचा उद्देश आहे.
*भरारी पथकांची कामे:*
• जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या तक्रारी भरारी पथकातील सदस्यांकडे थेट मांडाव्यात.
• बी-बियाणे व रासायनिक खते विक्री करताना शेतकऱ्यांना खरेदीची बिले दिली जातात की नाही याची तपासणी केली जाईल.
• निविष्ठा विक्री पावत्यावर शेतकऱ्यांची सही घेतली जाते का याची तपासणी केली जाईल.
• विनापरवाना निविष्ठा विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
• विक्रेत्यांची नोंदणी प्रमाणपत्रे व परवाने वैध आहेत का याची खातरजमा केली जाईल.
• गुणवत्ता नियंत्रणा संबंधित इतर सर्व जबाबदाऱ्या देखील यामार्फत पार पाडल्या जातील.
*भरारी पथकांची रचना:*
*जिल्हास्तरीय भरारी पथक:*
• पथक प्रमुख: कृषी विकास अधिकारी
• सदस्य: संबंधित उपविभागीय कृषी अधिकारी, मोहिम अधिकारी (जिल्हा परिषद), निरीक्षक (वैध मापन शास्त्र), जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक
*तालुकास्तरीय भरारी पथक:*
• पथक प्रमुख: तालुका कृषी अधिकारी
• सदस्य: कृषी अधिकारी (तालुका कृषी कार्यालय), निरीक्षक (वैध मापन शास्त्र), मंडल कृषी अधिकारी, कृषी अधिकारी (पंचायत समिती)
जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी खते व बियाणे खरेदी करताना बिले घेतल्याची खात्री करावी, तसेच कोणतीही तक्रार असल्यास भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. कृषी विभागामार्फत गुणवत्तेची हमी देण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात असून शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी ही पथके सक्रियपणे कार्यरत असतील, अशी माहिती कृषी विकास अधिकारी मुनिर बाचोटीकर यांनी दिली आहे.